Saturday, July 1, 2017

*कावेरी रंगन नोडदा*
शास्त्र केवळ संस्कृत मध्येच सांगितले गेले पाहिजे, इतर भाषेत ऐकल्यावर १००वेळा आंघोळ करणारे, परब्रह्म नारायणचा पूर्ण कृपानुग्रह असलेल्या दासांची वाक्ये आम्हाला प्रमाण नाहीत असे म्हणणारे महाभाग काही कमी नाहीत. पण यासाठीच एक श्रेष्ठ यति असून संस्कृत सोडून मुद्दाम मातृभाषेमध्ये आपला अंतरंग अनुभव सांगणाऱ्या एका सत्पुरूषांबद्दल आणि त्यांच्या एका रचनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
संतांच्या व्यक्तीमत्वाबद्दल त्यांच्या चरित्रापेक्षा त्यांच्या ग्रंथ रचना, अभंग रचना याच जास्त सांगून जातात. कारण त्यांच्या रचना म्हणजे केवळ बौद्धिक कसरतीतून केलेली शब्दांची मांडणी नसते तर साक्षात अंतर्यामी भगवंताचाच तो कृपाप्रसाद असतो. आणि त्यामुळे त्यांच्या उद्धाराबरोबरच इतर अनेक जीवांचाही उद्धार त्या कृतींमधून घडत असतो. अशाच सत्पुरूषांपैकी एक श्री श्रीपादराजस्वामी यांच्या एका रचनेचे चिंतन आपण आज त्यांच्या समाधी दिनानिमित्त करणार आहोत. लक्ष्मीनारायणतीर्थ, योगी हे त्यांचे आश्रमनाम पण तत्कालीन यतिवर्गातील त्यांची श्रेष्ठता योग्यता बघून त्यांना रघुनाथतीर्थांनी "श्रीपादराज" असे नाव दिले आणि त्यानेच ते प्रख्यात झाले.
ज्यांच्यामुळे व्यासराजातीर्थ विजयनगर साम्राज्याचे गुरू झाले, ज्यांच्यामुळे हरिदास परंपरेचा पाया रचला गेला, ज्यांनी संस्कृत या पंडित विद्वानांच्या भाषेपेक्षा कानडी या मातृभाषेत भगवद्महिमा सांगण्यावर भर दिला, ज्यांच्यामुळे सेल्वा नरसिंह राजावरील ब्रह्महत्येचा दोष नाहीसा झाला, जे साक्षात ध्रुवाचे अंश होते अशी मान्यता असलेले एक तपस्वी सिद्धपुरूष म्हणजे श्रीपादराजस्वामी. त्यांचा जन्म इसवी सन १४०४ रोजी कर्नाटकात चेन्नपट्टण (सध्याचे बंगलोर) येथे झाला. "वाग्वज्र" हा त्यांचा एकमेव संस्कृत ग्रंथ आहे. बाकी सर्व रचना या कानडीमध्ये आहेत. *"रंग विठ्ठल"* ही त्यांची नाममुद्रा होती. त्यांनी कर्नाटकातील मुळबागील या गावी नृसिंह तीर्थ येथे ज्येष्ठ शु. चतुर्दशी, इसवी सन १५०२ रोजी समाधी घेतली.
आज आपण जी रचना पाहणार आहोत ती महाराष्ट्रातील बहुतांश जणांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकली असेल. ती संपूर्ण रचना प्रथम पाहू. आज संपूर्ण रचनेचे विस्ताराने चिंतन शक्य नसल्याने थोडक्यात त्या रचनेचा आशय आपल्याला समजेल हा प्रयत्न आपण करूया.
*कंगळी द्यातको कावेरी रंगन नोडदा । कस्तुरी रंगन नोडदा ॥*
*जगंगळोळगे मंगळ मुरूति । रंगन श्रीपादंगळ नोडदा ॥*
स्वामी म्हणतात त्या डोळ्यांचा उपयोग काय जर ज्यांनी कावेरीच्या काठी स्थित रंगनाथाला पाहिले नसेल! कस्तुरीप्रमाणे सुगंध असणाऱ्या त्या रंगनाथाला पाहिलेच नसेल तर डोळ्यांचा उपयोग काय? अखिल विश्वाचा स्वामी असलेल्या जगातली सगळ्यात मंगल असे रूप असलेल्या रंगनाथाला पाहिले नाही तर या डोळ्यांचा उपयोग असा तो काय?
रंग म्हणजे मंच, व्यासपीठ अथवा आपला देह, इंद्रिये, यांचा जो नाथ आहे तो म्हणजे रंगनाथ, साक्षात परब्रह्म नारायण. त्यामुळेच स्वामी आपल्याला विचारत आहेत की ज्या भगवंताने आपलाल्या देह, इंद्रिये दिली जो त्याचा नाथ स्वामी आहे अशा भगवंतालाच तुम्ही पाहिलं नाहीत तर ही दृष्टी असूनही व्यर्थच आहे.तिचा काहीही उपयोग नाही!
*एंदिगादरोम्मे जनरू । भूमियल्लि निंदु ॥*
*चंद्र पुष्करणी स्नानव माडि । आनंददिंदलि रंगन नोडदा ॥१॥*
रंगनाथ हे भगवंताचे एक रूप आहे. शेषशयन या रूपासच रंगनाथ असे म्हणतात. दक्षिण भारतात तीन प्रमुख रंगनाथ मंदिरे आहेत. आदिरंगा, मध्यरंगा आणि अंत्यरंगा. आणि तीनही देवस्थाने कावेरी नदीच्या काठी आहेत. तसेच तिथे तीर्थ, पुष्करणी आहेत. त्यासगळ्याचे वर्णन स्वामी येथे करतात...
एके दिवशी सर्वजण मंदिरात येतात, इथल्या चंद्र पुष्करणीमध्ये स्नान करतात आणि आनंदाने रंगनाथाला बघतात पण ज्या डोळ्यांनी रंगनाथाला पाहिलं नाही त्या डोळ्यांचा काय उपयोग?
*हरि पादोदक सम कावेरी विरजा नदीय स्नानव माडी*
*परम वैकुंठ रंग मंदिर पर वासुदेवन नोडदा ॥२॥*
ही कावेरी नदी म्हणजे साक्षात हरि पादोदकच आहे. तिच्यात स्नान करणे म्हणजे सत्यलोकीच्या विरजा नदीत स्नान केल्यासारखेच आहे. हे रंगनाथाचे मंदीर म्हणजे साक्षात वैकुंठच आहे पण इथल्या वासुदेवाला पाहिले नाही तर या डोळ्यांचा काय उपयोग?
*हार हीर वैजयंति तोर मुत्तिन हार पदक*
*तेरनेरि बीदिलि बरूव श्री रंगविठ्ठल रायन नोडदा ॥३॥*
शेवटच्या चरणात स्वामी म्हणतात, हार, हिरे मोती, वैजयंती या सर्वांमुळे शोभून दिसणाऱ्या, रथामध्ये विराजमान असणाऱ्या रंग विठ्ठलाला म्हणजेच नारायणाला पाहिलं नाही तर या डोळ्यांचा उपयोग काय?
या अभंगातून अनेक संदर्भ स्वामींनी दिलेले आहेत जे साधनेला पूरक आहेत. श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः हा उपनिषदांचाच सिद्धांत स्वामींच्या सर्व रचनांमधून बघायला मिळतो. सतत भगवंत अनुसंधानात राहण्यासाठी स्वामी आपल्याला सांगत आहेत. तीर्थक्षेत्री निश्चितच जावे त्यातूनच बैठक तयार होत असते पण तिथे जाऊन नेमके कोणाला आणि कसे पाहायचे हे जाणले पाहिजे यासाठीच भगवंताबद्दल श्रवण, मनन केले पाहिजे आणि त्यामुळे काय होते हे स्वामी अजून एका अभंगात सांगतात, त्यासाठी ते "ध्यानगोचर" असा प्रयोग करतात. सतत श्रवण, मनन केल्यामुळेच तो ध्यानगोचर होतो .त्यामुळेच आधी डोळ्यांनी त्याला पहा म्हणजेच अंतःचक्षुंनी पाहता येईल!
आपलेही अनुसंधान असेच टिकावे आणि एक दिवस आपल्यालाही तो पाहता यावा हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करत भगवंत स्मरणात इथेच थांबूया.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥*
*लेखक - वादिराज विनायक लिमये*
*भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७*

No comments: