Saturday, October 1, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)
श्रीमन्मध्वाचार्यांनी रचलेल्या कर्नाटक संगीताच्या पायावर दासपरंपरेने कळस चढवला. त्यातले दासश्रेष्ठ, दास परंपरेतील, एकप्रकारे हरिदासांच्या चळवळीतील प्रमुख दास म्हणजे संत श्रीपुरंदरदास. भगवंताने ज्या कार्यासाठी पाठवलंय ते कार्य तो कसे पूर्ण करून घेतो याचे एक उदाहरण म्हणजे दासांचं चरित्र आहे.
हरिदास बनण्याआधी अतिशय धनाढ्य, पैशाचीच रात्रंदिवस चिंता असणाऱ्या, त्याचाच विचार करणाऱ्या, दासांची भगवंत एका प्रसंगातून परीक्षा घेतो आणि दास वर्षानुवर्षे जपत आलेल्या सावकारीवर, घर-दारावर दास तुळशीपत्र ठेवतात आणि गुरूशोधार्थ निघतात. यात त्यांची पत्नीही त्यांना साथ देते.
"विजयनगरात हंपी येथे श्री व्यासराजतीर्थांकडे जा आणि हरिदास हो" असे स्वप्नात भगवंताने येऊन सांगितल्यावर दास हंपी येथे आले. स्वामींनी त्यांना गुरूपदेश केला आणि हरिदास दीक्षा दिली.
अतिकर्मठ, प्रकांडपंडित असून अहंभाव असणाऱ्या, वेदांत हा फक्त आपल्यासाठीच, अशी चुकीची समजूत झालेल्या मंडळींकडील तत्त्वज्ञान सकल जनमानसासाठी खुले करून देणे हाच या दास चळवळीचा उद्देश. आणि या दासपरंपरेने केवळ कर्नाटकच नाही तर जवळ जवळ भारतभर त्यांच्या कार्याचा प्रसार केला. हाती वीणा आणि चिपळ्या, अंगी चंदनाचे टिळे आणि भगवंताचा महिमा, स्तुती, त्याचे कारूण्य, त्याचे स्वरूप आणि तत्त्वज्ञान या सगळ्यावर रचना करत करत गावोगाव संचार करणे हे दासकूटाचे कार्य. (कूट म्हणजे समूह) तत्त्वज्ञान कोणतेही असो त्याचा आधार घेऊन सत्य अनुभवता येते. दासपरंपरेने केवळ संस्कृतमधील तत्त्वज्ञान सोप्या व प्रांतांच्या भाषेप्रमाणे मांडले नाही तर स्वतः तत्त्वज्ञानाच्या आधारे सत्य अनुभवले, परब्रह्म नारायणाला ओळखले आणि मग त्याला ओळखण्याचा मार्ग, त्याचे स्वरूप, साधनेतील अनुभव हे सर्व आपल्या रचनांमधून मांडले. कर्नाटकातील दास परंपरा आणि महाराष्ट्रातील वारकरी परंपरा या परस्पर पूरक चालत आल्या आहेत. साधारण इसवी सन १२०० ते १८०० हा काळ कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या भूमीने भक्ती,विठ्ठल आणि संगीत हे एकत्र अनुभवलं. विद्वानांनी विभाजन केलेला समाज एकत्र करण्याचे खूप मोठे कार्य दास आणि वारकरी परंपरेने केले आहे.
या दासकूटाने त्यांच्या पदांमधून, रचनांमधून कर्नाटकातून महाराष्ट्रात गेलेला पांडुरंग जणू काही कर्नाटकात परत आणला. त्यांच्या रचना, अभंग हेच त्या परब्रह्म पांडुरंगाचे मूर्त रूप झाले. त्यामुळे तो कर्नाटकु विठ्ठलु मूर्त पाषाणरूपाने महाराष्ट्रात असला तरी दास साहित्यरूपी विठ्ठल कर्नाटकातच होता, आहे आणि असेल. असं सामर्थ्य ज्यांच्या पदांमध्ये आहे असे दासपरंपरेतील दासश्रेष्ठ म्हणजे संत श्रीपुरंदरदास. यांच्या ४,७५,००० रचनांपैकी एक रचना आपण या जगन्मातेच्या या नवरात्रोत्सवात जाणून घेणार आहोत.
खरंतर ही रचना, हा अभंग महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात अमुक एक अभंग कुणी रचला हे हे जसे माहित असते तसे कानडीत असल्यामुळे सहाजिकच या रचनेचे नाही. पण ही रचना कुणाची आहे यावरून नाही तर ती कुणी गायलेय यावरून लोकप्रिय झाली आहे. त्यात गैर काहीच नाही. पं. भीमसेन जोशींचा स्वर, गाण्याची स्वर रचना यावरून ते अधिक लोकप्रिय ठरले आहे. आणि त्याचा अर्थ हा सहज उपलब्ध होईल असा नसल्याने किंवा त्याचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा नसल्याने कदाचित ही रचना गायक आणि संगीत इथपर्यंतच मर्यादित राहिली असावी. पण म्हणूनच आज अश्विन शु. प्रतिपदेपासून अश्विन शु. दशमी पर्यंत आपण "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" या रचनेचे निरूपण बघणार आहोत. या रचनेच्या स्वर,संगीताबरोबरच पुरंदरदासांचं श्रेष्ठत्वही या रचनेचा अर्थ जाणून घेतल्यावर कळेल आणि या रचनेचा अर्थ कळल्यावर जेव्हा ही रचना आपण पंडितजींच्या स्वरात ऐकाल तेव्हा स्वरांमध्ये जितके रममाण होता तितकेच आई लक्ष्मीच्या अनुसंधानात राहाल अशी खात्री आहे.
प्रथम मूळ रचना पूर्ण देत आहे आणि नंतर एक एक दिवस आपण त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा । नम्ममा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ॥
हेज्जेय मेलोंद्‍हेज्जेय निक्कुत । गेज्जेय कालिन नादव तोरूत ॥
सज्जन साधु पूजेय वेळगे । मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ १ ॥
कनक वृष्टिय करेयुत बारे । मन कामनेय सिद्धिय तोरे ॥
दिनकर कोटि तेजदि होळेयुव । जनकरायन कुमारि बेगा ॥ २ ॥
अत्तितगलदे भक्तर मनेयोळु । नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥
सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥ ३ ॥
संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । कंकण कैय तिरूवुत बारे ॥
कुंकुमांकिते पंकज लोचने । वेंकटरमणन बिंकद राणि ॥ ४ ॥
सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥
अक्करेयुळ्ळ अळगिरिरंगन । चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि ॥ ५ ॥
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
LikeShow more reactions
Comment

No comments: