Sunday, June 26, 2016

देहि मे तव दास्य योगं (पुष्प २)
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम (भाग ४)
गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि त्यामुळे माझ्या भास्कर गुरूंमुळे मला आत्मस्वरूप समजले. ज्ञानयुक्त आनंद आणि आनंद युक्त ज्ञान मला मिळालं म्हणून दास म्हणतात "भास्कर गुरू दयकरूणा" आता याचं अजून विश्लेषण करायचे ठरवले तर आपण म्हणू की दया आणि करूणा याचा अर्थ एकच आहे मग ही पुनरुक्ती दासांनी का केली. जसं संस्कृतमध्ये पाकं पचति असे असते. पाक हाच पचनासाठी असतो पण तरी पाकं पचति असं संस्कृतमध्ये म्हणतात. थोडक्यात ideaची कल्पना!
पण दास इथे असं वापरतात याला अर्थ आहे, त्यामागे विचार आहे. भास्कर गुरूंनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं ही दया दाखवली आणि त्यामुळे भगवंताची करूणा मला अनुभवता आली आणि पुढे म्हणतात, भास्कर गुरू दयकरूणा । दास महिपती गे आभरणा ॥ ही करूणा हाच या महिपती दासाचा अलंकार, आभरण, खरा दागिना आहे. भास्कर गुरूंनी जे साधन मला दिलं त्यामुळे जो साक्षात्कार मला झाला त्यामुळे भगवंत आणि मी त्याचा दास आहे हे मला कळलं हेच माझ्यासाठी आभरण आहे. सोहम् साधनेतून दासोहम् साधलं गेलं. सर्वच्या सर्व दास साहित्याला कानडीतील उपनिषद म्हणतात. यातील एक-एक पदातून उपनिषदांचेच सार व्यक्त होते.
यानंतर परात्पर गुरू श्री मध्वाचार्य यांच्याविषयी दास म्हणतात,
गुरूमध्वमुनीरन्ना । मुरूपरीय तोरीदे नन्न नीन्ना ॥ हरि भक्तीय अविच्छिन्ना । समारारू धरे योळू निन्ना ॥
अखिल विश्वाला शुद्ध वेदांत देणारे आचार्य मध्वमुनी हे एक विलक्षण तेजस्वी, अमूल्य, अनर्घ्य रत्न आहेत. हे मला समजलं याला कारणंही भास्कर गुरूच. बघा हा द्वैता-द्वैत वाद मिटून दृष्टी विशाल कशी होते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पुढे म्हणतात, "मुरूपरीय तोरीदे नन्न नीन्ना" मुरू म्हणजे तीन. तीनही अवतारात तुम्ही वेगवेगळे कार्य केले. प्रथम हनुमान अवतारात पौरूष, ब्रह्मचर्य. दुसऱ्या भीम अवतारात पौरूष, गृहस्थ आणि तिसऱ्या मध्वाचार्य अवतारात शुद्ध वेदांत, संन्यासी. पण असे फरक असले तरी एक गुण सारखाच होता तो म्हणजे हरि भक्तीय अविच्छिन्ना । अविच्छिन्न अशी श्रीहरी भक्ती. तिनही अवतारात परम विष्णुभक्ती तुम्ही केलीत. आणि तुमच्या समान, तुमच्याहून श्रेष्ठ असे दुसरे कुणी नाहीत. जगाला खरा नेमका शुद्ध वेदार्थ देणारे तुम्हीच आहात.
दास परंपरा याचा पाया हा शुद्ध भक्तीमार्ग आहे. वैष्णव धर्म हाच ज्ञानपूर्वक भक्तीमार्गावर असल्यामुळे दास साहित्यातून ते दिसतंच. महिपती दासांच्या साहित्यात मात्र भक्ती बरोबर हठयोगाचेही दर्शन होते. त्यामुळे योग आणि भक्ती यांचा संगम म्हणजे महिपती दासांचं साहित्य आहे. आपल्यातील अध्यात्मिक केंद्रे जागृत करून अंतरंग दर्शन होणे हे हठयोगाने साध्य होते. पुरंदरदासांच्या काही रचनांमध्ये याचा उल्लेख येतो. पण महिपती दासांच्या खूप रचनांमध्ये याचे दर्शन आपल्याला होते.
महिपती दासांचं साहित्य अनुभवातून आलेलं असल्यामुळे मला भगवंत दिसला या प्रकारची पदे त्यांच्यात आहेत. मुळात हे शास्त्र अनुभवावर उभे असल्यामुळे दास त्यावर जास्त भर देतात. ते एक महान साधक होते हे त्यांच्या साहित्यावरून लक्षात येते. पण त्यांच्याकडे, त्यांच्या साहित्याकडे तसे दुर्लक्ष झाले हे खरोखरंच आपले दुर्दैव.

No comments: