Thursday, August 20, 2015

भज गोविन्दम ॥2||


      ॥ भज गोविन्दम-२॥     
मूढ जहीहि धनागमत्रुष्णाम।कुरू सदबुध्दि मनसि वित्रुष्णाम ॥
यल्लभसे निजकर्मोपात्तं । वित्तं तेन विनोदय चित्तम ॥२॥
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम  मुढमते॥ध्रु
अर्थ:- आचार्य या श्लोकाच्या आरंभालाच "मूढ" शब्दाने सुरवात करतात. मुर्ख लोक हे अद्न्यानी असतात , सकाम असतात त्यांना धनाची संपत्तीची हाव असते. सारासार विचार त्यांच्या ठिकाणी नसतो.आशा लोकांना आचार्य म्हणतात "हे मुर्खा ! (अद्न्यानी) हि धनत्रुष्णा तु सोडुन दे  ! मनात सद्बुध्दि सतत राहावी  व या वित्रुष्णेपासून दुर राहा आणि जे तुझ्या कर्माने तुला मिळेल त्यात तु समाधानी रहा.
 भावगंध :- मुढ शब्दाचा पातंजल योगशास्रामधे अर्थ दिलेला आहे.त्यात चित्ताचे- क्षिप्त चित्त,विक्षिप्त चित्त, निरुध्द चित्त, एकाग्र चित्त, चंचल चित्त, मुढ चित्त असे प्रकार सांगितले आहेत." मुढ" चित्त म्हणजे ‘तमोगुणाने व्यप्त’ असलेले चित्त.अशा चित्ताच्या माणसाला झोप जास्त असते." किर्तनी बसता निद्रे नागविले । मन हे गुंतले विषयसुखा ॥ना.म.॥ मुढ चित्ताच्या व्यक्तिला श्रवणात गोडि उत्पन्न होत नाहि. पण प्रापंचीक गप्पा, पॆशाची चर्चा निघाल्या कि मग मात्र हा सावध होतो. धनाचा लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाहि. श्रीमदभागवत ११वा स्कंधामधे कदर्यु आख्यान आहे. हि कदर्यु ब्राह्मण इतका कंजुस असतो की त्याच्या घरातधान्याचे कोठारे भरलेली असुनहि  मुंगीला उपवास , उंदराला लंघन घडत होते.घरच्या लोकांना ताजे अन्नहि मिळु देत नव्हता एव्हढा धनलोभी होता. कालाच्या ओघात त्याचे होत्याचे नव्हते झाले व नंतर त्याला विरक्ति झाली व त्याने त्याने धनाचे नश्वरत्व सांगितले . तो म्हणतो धनाच्या मागे १५ अनर्थ आहेत .काम. क्रोध,लोभ,मोह,मद,मत्सर आदी अनेक विकार फक्त धनामुळे येतात. ज्याच्याजवळ धन असते असा मनुष्य अतिशय अहंकारि असतो त्याला वाटते तो धनाच्या बळावर काहिहि प्रप्त करू शकतो जगद्गुरू श्री तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात " धनमान बळे नाठविसी देवा ।म्रुत्युकाळी तेव्हा कोण आहे ॥" किंवा तुका म्हणे धन ।धनासाठी देती प्राण ॥ धन मिळविण्यासाठी नरबळी दिल्याच्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो. आता भरपुर पॆसे मिळाले असे कधीच कोणाला वाटत नाहि.
                  धन दारा पुत्र जन । बंधु सोयरे पिशुन ।सर्व मिथ्या हे जाणुन । शरण रिघा देवासी॥ ना.म.।
हे सर्व मिथ्या "जाणुन" या शब्दाला महत्व आहे, धन टाकायचे नाही तर ते मिथ्या, नष्ट होणारे आहे असे जाणुन त्याचा विनियोग करायचा. "वेचोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥" त.म. अशा पध्द्तीने धनाचा वापर केला तर ते धन तारक ठरते नाहि तर तेच धन मारक ठरते.
 "म्हणे आजि मिया । संपत्ती बहुतेकाचिया । आपुल्या हाती केलिया। धन्य ना मी ॥ माउली॥ धनत्रुष्णा मोठि वाईट आहे. असा माणुस कंजुस असतो विधायक कामासाठि कधी वर्गणिही देणार नाहि उलट "उष्ट्या हाते नुडवी काग ॥" उष्ट्या हाताने तो कावळा सुध्दा उड्वीत नाही कारण हातातील शिते जर कावळ्याला मिळाले तर ?!!! 
              येथे येउनि केलेसी कायी । विठ्ठ्लु नाहि आठविला ॥१॥
               अहा रे मुढा  भाग्यहिना। गेलासी पतना मोह भ्रमे ॥२
            तात्पर्य अशा व्यक्तीला मुढ म्हणतात. म्हणुन आचार्य फार सुंदर उपाय सांगतात. ते म्हणतात अरे! जीवा तु मनात सद्बुध्दी , विरक्ति, निराभिलाषी होण्याचा प्रयत्न कर.व्यवहार सोडायला ते सांगत नाहित फक्त अलिप्तपणे व्यवहार करायला सांगतात."पद्मपत्रमिवांभसा " कमळाचे पान पाण्यात असते परंतु ते त्या पाण्यात लिप्त होत नाहि. "मग मी व्यवाहारी असेन वर्तत । जेवी जळाआत पद्मपत्र ॥तु.म.॥   ह्याप्रमाणे जीवनात राहिले तर समाधान प्राप्त होते.
              प्रतेकाला त्याच्या कर्मानुसार फल मिळत असते. " मना त्वाचि रे पुर्व संचित केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ श्री रामदास स्वामी ॥  कर्मानुसार संचित होते व संचितच पूढे प्रारब्ध म्हणुन भोगायला प्राप्त होते. प्रारब्धेचि जोडे धन । प्राब्धेचि वाढे मान ॥ १॥ प्रारब्धेचि भरे पोट । तुका करिना बोभाट ॥  ज्याप्रमाणे आपण कर्म करु त्याप्रमाणे जर घडत असेल तर आता दोष कोणाला द्यावा? म्हणुन "तुका म्हणे आता देवा का रुसावे । मनासि पुसावे काय केले ?॥" 
               कलियुगात सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण . शुध्द चित्त करुन जर  नामभक्ति केलि तर सहज अत्यंतिक समाधान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो.म्हणुन" ठेविले अनंते तॆसेची राहावे । चित्ती असु द्यावे समाधान" ॥ हे श्री तुकाराम महाराजांचे म्हणने किती सार्थ आहे हे पटते. संतांनी जगाला आळसी न बनवता मानसीक समाधान(Satisfaction of mind) कसे प्राप्त करावे हे सांगीतले व सुखी संसाराची गुरूकिल्ली आपल्या हातात दिली आहे. 

No comments: